लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली   

वैष्णवीच्या वडिलांचा आरोप

पिंपरी : आलिशान मोटार दिली नाही, तर आम्ही लग्न मोडू, अशी धमकी हगवणे यांनी आम्हाला दिली. त्यामुळे आम्ही आलिशान मोटार घेऊन दिली आणि मुलीचे लग्न लावून दिले. आलिशान मोटार देण्याआधी मी दुसरी मोटार बुक केली होती. त्यांनी वाद घातला. आलिशान मोटार नाही दिली, तर मी दुसरी मोटार पेटवून देईन, असे सांगितले. त्यामुळे, आम्ही आलिशान मोटार दिली. आरोपीकडे पाच कोटीच्या मोटारी नाहीत, असे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी सांगितले. तसेच, मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, असे म्हणते कस्पटे ढसाढसा रडले.     
 
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे यांसह पत्नी, सासू, नणंद यांना बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी हगवणे यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद केला. आमच्याकडे पाच कोटींच्या मोटारी आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या मोटारीसाठी कशाला छळ करू? असे म्हणत वकिलांनी प्रश्न उपस्थित केला होता. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा, असल्याचे त्यांनी युक्तिवादात सांगितले. 
 
वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते, अशी अजब वक्तव्य यावेळी वकिलांनी केली. त्यानंतर काल वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत वकिलांच्या वक्तव्याबाबत खुलासा केला.  
 
आरोपीचे वकील बोलले ते मी आणि समाजाने ऐकले. ते चुकीचे बोलले, असे एखाद्या मृत मुलीच्या चारित्र्यावर बोलणे चुकीचे आहे. त्यांनी केलेले कृत्य आणि माझ्या मुलीच्या बळीला वेगळी कलाटणी द्यायची आहे. मोबाइल चॅटिंगबाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती. कुठलीही माहिती दिली नव्हती. माझ्या मुलीवर चारित्र्याचा संशय घेतला आहे. मी जावयाला दीड लाखाचा मोबाइल दिला. त्यांनी मागितला, त्यानुसार मी मोबाइल दिल्याचे सांगताना विकत घेतलेल्या मोबाइलची पावती दाखवली. आजही मी आरोपीला दिलेल्या मोबाइलचे हप्ते भरत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मुलीची दोन लग्न मोडली होती, त्याला हगवणे कुटुंबच जबाबदार असल्याचे सांगताना अनिल कस्पटे ढसाढसा रडले. 
 
त्यांच्याकडे एकच मोटार आहे. ते जे ९० लाखांची मोटार आमच्याकडे असल्याचे सांगत आहेत ती चंद्रकांत हुचडे यांच्या नावाने आहे. हगवणे कुटुंबाकडे कुठलीही मोटार नाही. मोटार नाही दिली तर, लग्नाला उभे राहणार नाही, लग्नातून निघून जाईन, अशा धमक्या देऊन माझ्याकडून सगळा हुंडा घेतला. अधिक महिन्यात जावयाला चांदीचे ताटच पाहिजे, असाही हट्ट धरला होता. तो पण मी पूर्ण केल्याचा आरोप त्यांनी केला.
 
वैष्णवीचे मामा म्हणाले, सुनेचा मृत्यू झाला हे कळल्यावर त्यांना बाळाचे सुचले कसे? निलेश चव्हाण देखील या कटात सहभागी होता. त्यावेळी तो ही तिथे होता. ज्यावेळेस कस्पटे कुटुंब बाळाला आणायला गेले. त्यावेळेस त्याठिकाणी ते नव्हते. परत या, असे आम्हाला सांगण्यात आले. मग, आमचे कुटुंब त्या बाळाला आणण्यासाठी निलेश चव्हाण याच्या घरी गेले. बाळ आणायला गेले, त्यावेळेस पिस्तूल दाखवून भीती दाखवली. निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ कसे गेले? हा आमचा प्रश्न आहे.

Related Articles